चार दिवसांच्या खंडानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळपासून एसटी बस रस्त्यावर धावतील. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे भाऊबिजेदिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संप मागे घेत असल्याचे पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.
उच्चस्तरीय समितीमध्ये अर्थ सचिव, परिवहन सचिव (गृह), परिवहन आयुक्त, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक या चार जणांसह एकूण पाच जणांचा समावेश असेल, अशी माहिती यावेळी सरकारच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली. पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती आपला प्राथमिक अहवाल 15 नाेव्हेंबरपर्यंत तर अंतिम अहवाल 21 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करावा, असे सूचवले आहे.
No comments:
Post a Comment